आई चिमणीचे नाव घेऊन घास भरवायची; आज चिमण्यांना वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर

53

आई चिमणीचे नाव घेऊन घास भरवायची; आज चिमण्यांना वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

जागतिक चिमणी दिवस साजरा करतांना चिमण्यांना कशापध्दतीने वाचविता येईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. चिमण्यांना रहाण्याकरीता घरटे नाहीत याकरिता वृक्षारोपण व्हायला हवे, उन्हाळ्यात चिमण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे आतापासूनच जीथे-जीथे चिमण्या येवू शकतात तीथे-तीथे किंवा आपल्या घराच्या भिंतीवर किंवा घरावर एखाद्या तबकड्यात पाणी अवश्य ठेवावे सोबतच खाण्याकरिता थोडे तांदळाचे दाणे किंवा खाद्य टाकावे.कारण चिमण्यांना खरोखरच आपली नितांत गरज आहे.अन्यथा ज्या चिमण्या दिसतात त्या सुध्दा लुप्त होवू शकतात याला नाकारता येत नाही.चिमण्यांच आपल्या मानव जातीवर खुप मोठे उपकार आहेत ते तर आपण फेडु शकत नाही.परंतु आज बदलत्या काळानुसार त्यांच्यावर मोठे संकट आले आहे.त्यातुन मुक्त करण्यासाठी थोडा हातभार लावु शकतो याकरिता पाण्याची सोय व खाद्यान्नाची सोय सर्वांनीच आपापल्या परीने केली.चिमण्यांच्या अनुषंगाने अनेक पक्षी पाण्याचा व खाद्यान्नाचा स्वाद अवश्य घेतील आणि आयुष्य वाढेल व चिमण्यांचा किलबिलाट सर्वत्र दिसून येईल.

जगातील चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेता जगातील देशांनी चिमण्यांना वाचविण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचे जाहीर केले.याकरीता 20 मार्च ही तारीख ठरविण्यात आली आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने पहिला जागतिक चिमणी दिवस 20 मार्च 2010 ला साजरा करण्यात आला.भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा,मानसाच्या जवळपास वावरणारा व नेहमी डोळ्यांनी दिसणारा पक्षी म्हणून चिमणीची भारतभर चांगलीच ओळख आहे.आज जगातील बदलत्या तापमानामुळे व हवामानामुळे, परमाणू परिक्षण, वाढते औद्योगिकीकरण, वाढते शहरीकरण, जंगलतोड, शेतातील रासायनिक खतांचा वापर व किटकनाशके,वणवे लागणे,ध्वनी प्रदुषण,पाणथळ्यांच्या जागा नष्ट झाल्याने आणि जगातील यूध्दजन्य परिस्थिती यामुळे चिमण्यांसह अन्य पशु-पक्षांचे जगणे अत्यंत कठीण झाले असुन धोकादायक स्थितीत आहे.यामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.आज जंगल तोडीमुळे जंगलातील पशु-पक्षी शहराकडे धाव घेतांना दिसते.हा संपूर्ण प्रकार निसर्गाचा होत असलेल्या ह्रासामुळे दिसून येतो व मानवजातीच्या अतीक्रमनामुळे निर्माण झाला आहे.पुर्वी कवेलुचे घर असायचे, मातीच्या भिंती असायच्या त्यामुळे चिमण्या आपले घरटे कुठे तरी अवश्य बनवायचे.कारण कवलाचे घर व मातींच्या भिंती नेहमी थंड असतात याचा सहारा घेऊन रहायचे.त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आपल्याला चिमण्यांचे घरटे अवश्य दिसायचे व चिमण्यांचा मधुर किलबिलाट ऐकू यायचा.यावरून सकाळचा काय वेळ झाला आणि संध्याकाळचा काय वेळ झाला हे त्यांच्या किलबिलाट वरून ताबडतोब सर्वांनाच लक्षात यायचे.परंतु आज चिमण्यांचा किलबिलाट नामशेष झाल्याचे दिसून येते.आज चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही, पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते अशी भयावह परिस्थिती आज चिमण्यांची झाली आहे.आज घरांचे सिमेंटीकरण झाल्याने चिमण्यांना घरटे बांधण्यास मोठा संघर्ष करावा लागतो आहे.वाढत्या प्रदुषणांमुळे चिमण्यां व इतर पशु-पक्षांना हवेत मोकळा स्वास सुध्दा मिळु शकत नाही.अशी कठीण परिस्थिती पशु-पक्षांवर असलेली आहे.आपण चीनचा विचार केला तर 1958-62 या कालावधीत चार किटक मोहिम राबविण्यात आली त्यात पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजे उंदीर,माश्या,डास आणि चिमण्या हे चार नष्ट करायचे सरकारने ठरविले.यामुळे चीनमध्ये चिमण्या जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून येते.त्यामुळे याचा गंभीर परिणाम चीनच्या पर्यावरणावर झाला आहे.यानंतर पक्षी तज्ज्ञांनी अभ्यासाच्या अंती सांगितले की चिमणी पर्यावरणाच्या दृष्टीने जगाला  आवश्यक आहे.जगभरात 26 जातिंच्या चिमण्यांची नोंद आहे.परंतु यातील अनेक चिमण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.जगातिल पक्षांचा विचार केला तर 867 प्रजाती आहेत.परंतु गेल्या पंचवीस वर्षांत आतापर्यंत पक्षांच्या संख्येने सर्वात मोठी घट झाली आहे.त्याचप्रमाणे कीटकभक्ष्यी चिमण्यां सारख्या पक्षाची संख्या कमी होने अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.कारण चिमण्यांची घटती संख्यांचा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा  आहे.कारण पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किटक चिमण्या खायच्या परंतु चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळे पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होतांना दिसतो.एकेकाळी चिमणी हा आपला अत्यंत महत्त्वाचा पक्षी होता कारण लहान मुले जेवणाकरीता कंटाळा करायचे तेव्हा आपली आई किंवा आजी चिमणीची आठवण अवश्य करायची व लहान मुले पोटभर जेवण सुध्दा करायची.”चिव चिव ये चारा खा पाणी पी आणि भुर्र उडून जा” असे म्हणत आपला घास भरत यामुळे आपलं बालपण समृद्ध झाल.कारण आई व आजी इतर पक्षांची ओळख करून देतांना चिऊताईचा लाड जास्तच करायची.चिमण्यांनी  आपल्याला बरेच काही दिले त्यामुळे आज त्यांना आपल्या कडून फक्त पाण्याची अपेक्षा आहे ती आपण अवश्य पुर्ण करू या.जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून भारतासह जगातील संपूर्ण देशांनी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प करावा व वृक्षारोपण करावे.यामुळे गुरांना चारा,पशु-पक्षांना रहाण्यासाठी घरट्यांसाठी जागा उपलब्ध होईल, मानवाला शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल.यामुळे पर्यावरण सुधारण्यास मदत होईल व निसर्ग प्रफुल्लित होईल आणि जिकडे-तिकडे हिरवागार गालिचा पसरलेला दिसुन येईल.आपण सर्वांनीच चिमण्या वाचविण्याचा संकल्प करूया.

 

रमेश कृष्णराव लांजेवार

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)

मो.नं.9921690779, नागपूर