विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त दाखवून पोषण आहारावर शिक्षकांनीच मारला डल्ला
तपासणीत पितळ उघडे : एक वर्षापासून शाळेत न आलेला विद्यार्थी मात्र हजेरी पटावर
पोषण आहारावर पडलाय प्रश्नचिन्ह ? अंडी, केळी फक्त कागदावरच !

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : ( तुमसर ) भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. पटसंख्या टिकवण्यासाठी पोषण आहार सारख्या योजना सरकार राबवित असले तरी, अधिक पटसंख्या दाखवून मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती, शिक्षण विस्तार अधिकारी व एका जिल्हा परिषद सदस्यांसमोर चौकशी दरम्यान ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. आता सदर शिक्षकांवर कारवाई होते काय ? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शिक्षण सभापतीच्या तालुक्यातच हा प्रकार उघडकीस आला आहे. या तपासणी दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश साठवणे , जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर यावेळी उपस्थित होते.
राज्य व केंद्र सरकार शाळांना पोषण आहार देत आहे. यामध्ये मटकी , अंडी , केळी असा वेगवेगळा पोषण आहार पुरवठा करीत आहे. शिक्षण सभापती रमेश पारधी व विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर कारभार पुढे आला आहे. शाळेत येत नसलेल्या विद्यार्थ्यांची देखील पटावर हजेरी लावण्यात येऊन त्यांच्या नावावर मिळत असलेल्या पोषण आहाराच्या अपहार करत असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील रूपेरा , रनेरा , मोहगाव , येरली या शाळेत उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर रनेरा येथील शाळेत एक विद्यार्थी एका वर्षापासून शाळेत येत नाही. तरी देखील त्याची हजेरी नियमित लावली जात आहे.
*पोषण आहारावर पडलाय प्रश्नचिन्ह ?*
शासनाचे कोट्यावधी रुपये योजनेवर खर्च होऊनही योजनेतच त्रुट्या आहेत. सरसकट विद्यार्थी संख्या एवढा निधी शालेय पोषण आहारासाठी येतो. विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के नसली तरी निधी मात्र शंभर टक्के खर्च होतो. दरवर्षी याचे अंकेक्षण होत असल्याने आता आणखी अंकेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
*अंडी, केळी मात्र दिसते कागदावरचं ?*
अनेक शाळेत अंडी, केळी अजिबात दिली जात नाही. कधी कधी प्रसंगीच दिली जातात. तरीही दिल्याचे कागदोपत्री नमूद केले जाते. ही बाब शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना ही माहिती आहे. परंतु तेही त्याकडे डोळे झाक करत आहे. व चुप्पी साधून मौनव्रत घेतल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांचेही खिसे गरम होत आहे. सदर योजनेत अपहार होत असला तरी “मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
*सदर प्रकरणात निलंबनाची कारवाई केली जाईल- रमेश पारधी*
तुमसर तालुक्यातील तपासणी केलेल्या शाळांमध्ये आढळलेल्या त्रुटींचा योग्य अहवाल तयार केला जाईल. संबंधित शिक्षकांची आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून निलंबनाची कार्यवाही केली जाईल. असे निर्णय शिक्षण सभापती रमेश पारधी जिल्हा परिषद भंडारा यांनी घेतले आहे.









