56 इंचाची छाती असेल तर बॅलेट पेपरने निवडणूक घ्या – डॉ.अभिलाषा गावतुरे 

60

५६ इंचाची छाती असेल तर बॅलेट पेपरने निवडणूक घ्या – डॉ.अभिलाषा गावतुरे, बल्लारपूर येथे मोर्चाद्वारे सरकारवर हल्लाबोल

मीडिया वार्ता वृत्तसेवा

मो: 8830857351

चंद्रपूर, ७ मार्च: जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात गुरुवार, 7 मार्च रोजी ईव्हीएम हटाव अशी मागणी करत भव्य मोर्चा काढण्यात आला. सोबतच शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळावा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, केजी टू पीजी शिक्षण फ्री व्हावे आणि नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद व्हावे या मागण्या सुद्धा करण्यात आल्या. या माेर्चात हजारो नागरिक सहभागी झाले हाेते. हा माेर्चा काटा गेट पासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदाेलकांनी आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनास केली. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार मतदान यंत्राच्या साहाय्याने आले असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले. मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे. मतदान यंत्राच्या बळावर सत्ताधारी भाजप आज चारशे पारचा नारा देत आहे. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अभिलाषा गावतुरे म्हणाल्या की देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात हे कळण्याचा मार्ग नाही.

शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. आज देशातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सगळे आंदोलन उतरले आहेत पण देशातल्या या सरकारला कोणाचीही सूध घेण्याची काळजी नाही किंबहुना त्यांचे शोषण करण्याचे, शेकडो शेतकऱ्यांचे प्राण सरकारने घेतले,शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतो कारण त्यांना आता त्यांच्या मताची गरज राहिली नाही. त्यांच्या विरोधात जरी मतदान झाले तरी ते सत्ताधारी ईव्हीएम च्या माध्यमातून स्वतःकडे वळते करतात आणि म्हणून देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या बद्दल सरकारला कुठलीही आस्था नाही त्यांना फक्त त्यांच्या भांडवलदार मित्रांच्या घशामध्ये या देशातील अरबोची संपत्ती टाकायची आहे आणि त्यासाठी ईव्हीएम हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र ठरलेले आहे म्हणून ते हटले पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर लोकांना त्यांचा मतदानाचा खरा अधिकार प्राप्त झाला पाहिजे आणि हा अधिकार केवळ बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मिळू शकतो.

यामुळे ईव्हीएम बंद करण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले. मोर्चाला ज्येष्ठ समाजसेविका रजनी हजारे, चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, भास्कर भगत, प्रा. विजय लोणबले रितेश बोरकर यांनी सुद्धा संबोधित केले. या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक उंचावत, घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तिथे मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. सोबतच जवळपास 28 हजार नागरिकांनी स्वतंत्ररीत्या स्वाक्षरी केलेले 28 हजार निवेदने यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी भूमिपुत्र ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विवेक खुठेमाटे, विजय मुसळे, विश्वास निमसरकर, ताहीर हुसेन, अनिस खान, रितेश राहुल मोहरले, नितेश म्याकलवार, राहुल दहिवले, अमोल काकडे, सतीश नेवारे ,श्रीकांत शेंडे, शंकर काळे, श्रीनिवास मासे शितल हस्ते, संगीता देठे, रेखा कोरे, रक्षा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.