अनाथांचा नाथ दिनांचा दयाळ : रुग्णमिञ गजुभाऊ कुबडे
एखाद्या झोपडीत विजेचा प्रकाश पसरवून त्या चंद्रमौळी झोपडीतील अंधःकार नाहीसा करणे असो की, कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त असलेल्याला वैद्यकीय सेवा वेळीच मिळवून देणे असो, शेतकऱ्याला उद्दाम सावकाराच्या विळख्यातून सोडविणे असो की घरादारापासून भटकलेल्या वृद्धाला अकुशल तिच्या आप्तस्वकीया पर्यंत पोहचून देण्याचे काम. प्रसंग कोणताही असो,! गरजू कोणीही असो. एक निरोप जर गजुभाऊ पर्यंत पोहचला तर हा व्यक्ती तातडीने त्या गरजू पर्यंत थेट मदत देऊन त्या गरजूचे पूर्णतः समाधान झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे आतापर्यंत साऱ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे.
हिंगणघाट रेल्वे स्थानकावर एक वयोवृद्ध महिला वाट चुकून अचानक आली. बेवारस म्हणून तब्बल महिनाभर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत बसलेली. कोणीतरी गजुभाऊला या वृद्धेबाबत गजुभाऊला सांगितले. झाले ! हातचे काम सोडून गजुभाऊ दत्त म्हणून त्या माऊलीच्या सेवेला हजर. संपूर्ण चौकशी करून घुगघुस या तिच्या गावी तिला सकुशल तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करे पर्यंत या महाशयाला स्वस्थता नाही. अशी एक ना दोन असंख्य काम. बर विविध गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थीक सोय नाही. अशावेळी गरजवंतांना आठवतो तो गजुभाऊ. अगदी थेट रत्नागिरी पासून तर वडसा देसाईगंज पर्यंत. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या गरीब गरजूसाठी गजुभाऊ संजीवनी ठरत आहेत. अंदाजे तीन महिन्यापूर्वी माझ्या वॉर्डातील एक मध्यमवर्गीय व्यक्तीला गंभीर आजाराने गाठले. आर्थिक परिस्थिती ओढग्रस्तीची. अशावेळी गजुभाऊंच्या कानावर मी या रुग्णांबाबत सांगितले. त्यांच्या आर्थिक परिस्थिती बाबत माहिती दिली. गजुभाऊने तत्काळ त्या रुग्णाला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. आणि भाऊ पैशाची काळजी करू नका. माझ्या आधी डॉक्टर कडून त्या रुग्णाच्या अवस्थेची माहिती घेतली आणि भाऊ उशीर झाला पण प्रयत्न करू म्हणत त्या घरच्या लोकांना धीर दिला. अखेर तो रुग्ण दगावला. पण गजुभाऊने सतत प्रयत्न करून फार मोठा आधार त्या परिवाराला दिला. अतिशय खडतर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांना वेळीच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून गजुभाऊने अनेक कुटूंब वाचविलेली आहे. पुन्हा नव्याने उभी केलेली आहे ते त्यांचे कार्य संतांच्या तोडीचे आहे. अशा अनेक गरजूसाठी गजुभाऊ हे साक्षात कृपेचा सागर पांडुरंग ठरले आहे म्हटल्यास ती अतिशोयोक्ती होणार नाही.