सत्ता नसली तरी जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज रहा: जयंत पाटील

सत्ता नसली तरी जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज रहा: जयंत पाटील

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पेझारीच्या भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत. या भूमीतून स्फूर्ती घेऊन वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. सत्ता असो, अथवा नसो; आगामी काळात जिल्ह्यात विजय खेचून आणण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे.असा विश्वास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, पक्ष बदलणाऱ्यांना उभे करायचे नाही. त्यांना निवडणुकीचे तिकीटही द्यायचे नाही. सध्या देशासह राज्याची परिस्थिती भयावह आहे. पीक विमा बंद आहे. लाडकी बहीण लाडकी राहिली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यां‍नी केले आहे. शेतकरी कामगार पक्ष पदाधिकारी निवड मेळावा रविवारी पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित करण्यात आला होता. त्या‍वेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते.

 

यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, ॲड. गौतम पाटील,
व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एका सामान्य कुटूंबातील शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो, हे नारायण नागू पाटील यांनी त्यावेळी आपल्या आंदोलनातून व लढ्यातून दाखवून दिले आहे. या भूमीला एक वेगळा इतिहास आहे. त्यांच्या लढ्याची प्रेरणा घेऊनच पेझारीमध्ये पक्षाचा मेळावा घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायण नागू पाटील यांनी लढा दिला..
शेतकरी कामगार पक्षाला सोडून जाणे काही नवीन नाही. यापुर्वीदेखील अनेकजण पक्षाला सोडून गेले आहेत. परंतु, पक्ष कधीच संपला नाही. वेगळ्या उमेदीने कार्यकर्त्यांनी काम करून पुन्हा पक्षाला बळ दिले आहे.
ज्यांना तयार केले. अनेक पदे दिली, ते निघून गेले. मात्र, एक वेगळ्या चिडीने आणि उमेदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागून आगामी काळात काम करायचे आहे. उद्याच्या निवडणूकीत आपलाच लाल बावटा फडकणार आहे, असा विश्वास आहे.

कामगारांनी रक्त सांडून कायदे केले. तेच कायदे पूसण्याचे काम हे सरकार करीत आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करण्याचा अधिकारही नसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. यासाठी शेकाप शेतकरी, भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहिल, असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या वेळी प्रा. एस. व्हि.जाधव,बाळाराम पाटील सुरेश खैरे, अँड. मानसी म्हात्रे,चित्रलेखा पाटील, ॲड. गौतम पाटील यांनी ही मार्गदर्शन केले.

पदाधिकारी निवड माहिती पुस्तकाचे अनावरण
शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा पेझारी येथे आयोजित करण्यात आला. या निमित्त पदाधिकारी निवड माहिती पुस्तकाचे अनावरण शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे यांच्या हस्ते आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या जन आघाड्यांच्या पदाधिकारी निवडीबाबतची माहिती उपलब्ध आहे.