भिवंडीत जललाभ कर व मललाभ कर वाढी विरोधात काँग्रेस पार्टीचे निदर्शने, भिवंडी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठोकले टाळे
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076
भिवंडी :- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने जललाभ कर व मललाभ कर यामध्ये वाढ केली असून निवासी मालमत्तांना १५ टक्के तर वाणिज्य मालमत्तांना २३ टक्के या दराने ही करवाढ केल्यामुळे भिवंडीतील नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे पार्टीचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालयाच्या गेट समोर दुपारी ०४:०० वाजताच्या सुमारास निदर्शने करीत संताप व्यक्त केला आहे. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी मुख्यालय प्रवेशद्वारावरील गेटला टाळे ठोकत तेथेच बैठक मारून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे, तारिक फारूखी, सोहेल खान, सलाम शेख, रुकसाना कुरेशी,आर्शि आजमी, यांसह अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. महानगरपालिका प्रशासनाने चालू वर्षीच्या घरपट्टी सोबत नवीन जललाभ कर व मललाभ कर वाढ करून घरपट्टी वसुलीची बिले दिली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. सन २०११ मध्ये पालिका प्रशासनाने अशी दरवाढ केली होती. त्यास नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर तो स्थगित केला होता. ११ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाचे प्रमुख प्रशासक असलेल्या आयुक्तांनी ही दरवाढ पुन्हा लागू केली आहे. तसेच प्रशासकांना अशी कोणतीही दरवाढ करण्याचा अधिकार नाही. येत्या काही महिन्यात पालिका निवडणुका झाल्यावर त्यावर लोकप्रतिनिधी यावर निर्णय घेतील. तोपर्यंत पालिका प्रशासनाने त्वरित या दरवाढीस स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केली आहे.