उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अतिवृष्टीचा घेतला आढावा

35

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अतिवृष्टीचा घेतला आढावा

दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकघेऊन सतर्क राहण्याचे दिले निर्देश

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

ठाणे/ पनवेल:ठाण्यासह कोकण पट्टीतील जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

यावेळी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई – विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची माहिती घेतली. यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून सरासरी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बदलापूर येथे काल एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना वगळता कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झाल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले.

मुंबई आणि कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली, तरीही पावसाचा जोर वाढला, किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी त्या त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे निर्देश याप्रसंगी दिले.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अहिल्यानगर येथे पावसाचा जोर कायम असून तिथेही पूर आला आहे. आज सकाळी आपण तेथील जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली, तसेच नदी जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रोहन घुगे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी ,या महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.