Home मुंबई Plastic ban: प्लास्टिकबंदी फलकांवरच

Plastic ban: प्लास्टिकबंदी फलकांवरच

81

मुंबई – राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर भाजी बाजारात प्लास्टिकबंदीसंबंधी ठिकठिकाणी फलक लागलेले दिसत आहेत, मात्र या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते आणि ग्राहक यांच्या प्लास्टिकवापरामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत नाही. ग्राहकांना अजूनही कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे प्लास्टिकची पिशवी द्या, अशी मागणी भाजीवाल्यांकडे केली जाते. प्लास्टिकबंदी लागू आहे आणि प्लास्टिकच्या पिशव्या दिल्यास दंड होईल, याची जाणीव ग्राहकही भाजी आणि फळविक्रेत्यांना करून देताना दिसत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकबंदीच्या फलकांनी अजून तरी अपेक्षित परिणाम साधलेला दिसत नाही. मुंबईतील काही मंडयांमध्ये प्लास्टिकऐवजी वर्तमानपत्रात भाज्या बांधून द्यायला सुरुवात झाली आहे, मात्र याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी मालाड विभागात कार्यरत असलेल्या सुभाष राणे यांनी ही बंदी अजून कठोरपणे लागू होत नसल्याचे सांगितले. ‘केवळ भाजी बाजारच नाही तर मोठ्या मॉलमध्येही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. या प्लास्टिकच्या पिशव्यांची जागा कागदी किंवा कापडी पिशव्यांनी घेतलेली नाही. याविरोधात मी महापालिकेकडे तक्रारही केली आहे’, ‘भाजीविक्रेते, फळविक्रेते यांना दंडाची जाणीव करून दिल्यावर तेवढ्यापुरत्या प्लास्टिक पिशव्या लपवल्या जातात, मात्र पुन्हा त्याचा वापर सुरू होतो’, असे त्यांनी सांगितले. विलेपार्ले येथील भाजीबाजारात प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न करणारे सतीश कोळवणकर यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. ‘प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर महापालिकेच्या भरारी पथकांनी अधिक कार्यरत होणे अपेक्षित होते. दंडात्मक कारवाई अधिक कडक व्हावी’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.