अहमदनगर : केडगावमध्ये काल निवडणुकीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या हत्यांमुळे केडगावसह अहमदनगरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या हत्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बंद पुकारला अाहे. सर्व दुकाने बंद आहेत. श्रीगोंद्यात कडकडीत बंद असून चौकात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
संग्राम जगताप, अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्यासह सुमारे ३० जणांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे नगरमध्ये दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
काल सायंकाळी केडगाव मध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांनतर तणाव निर्माण झाला होता. मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत हत्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह उचलू देणार नाही, असे म्हणत संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांना मृतदेह उचलू देण्यास मज्जाव केला. शिवसेनेने आंदोलनही केले. सुमारे सात तास हे मृतदेह तसेच रस्त्यावर पडून होते. रात्री एक वाजता ते उचलण्यात आले. रात्री या संदर्भातील फिर्याद देण्यात आली. तीन आमदारांसह तीस जणांविरुद्ध, कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









