Home latest News ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच, 12 जूनला होणार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच, 12 जूनला होणार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

56

अँड.रत्नाकर पाटील

अलिबाग:-रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता मात्र ही उत्कंठा लवकरच संपणार आहे. 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 329 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.12) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी 240 ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट असून 2026 या कालावधीत 89 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. एकूण 336 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहिर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.12) विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसुचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण काढले जाणार आहे. या आरक्षणानंतर प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचनेला बुधवारी (दि.17) जून रोजी जिल्हाधिकारी मान्यता देणे. शुक्रवार (दि.19) जून रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे. त्यानंतर गुरुवार (दि.25) जूनपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करणे. उपविभागीय अधिकारी यांनी शुक्रवारी (दि. 3) जूलै रोजी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसुचनेला मान्यता 8 जूलैला देण्याची प्रक्रीया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अलिबागमधील 38 ग्रामपंचायत

मूदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या अलिबाग तालुक्यातील शहापूर, आंबेपूर, श्रीगांव, कुसुंबळे, पोयनाड, कुर्डूस, बेलोशी, चिंचोटी, सारळ, रांजणखार, डावली, थळ, वरसोली, रामराज, सुडकोली, मापगांव, सातिर्जे, चेंढरे, बेलकडे, कुरुळ, ढवर, काविर, बामणगांव, सहाण, वरंडे, बोरघर, चौल, आगरसुरे, झिराड, धोकवडे, रेवस, परहूर, चरी, कुरकूंडी कोलटेंभी, ताडवागळे, मानतर्फे झिराड, सासवणे, पेझारी, वाघोडे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.