पैशाअभावी उपचार थांबला अन् गहिवरलेल्या मित्रांनी पसरला मदतीचा हात
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- गरिबीने खेळ मांडताच करंजीत वाहला माणुसकीचा निर्मळ झरा. गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेला गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव. साडेचार हजार लोखसंख्या असलेला हा गाव राजकीयदृष्या अत्यंत संवेदनशील आहे.येथील नागरिक भावनिक देखील तेवढेच. जेव्हा केव्हा गावावर कुठले संकट आले. एव्हाना ज्यांना कुणाला गावची आवश्यकता भासली त्या प्रत्येक वेळात येथील जनता मदतीला धावून गेली आहे. गावातील काही वर्षापूर्वीची ही परंपरा आज सुध्दा नवीन पिढी चालवित आहे. त्यांच्या संवेदनशील मनातून सामाजिक विचार समोर आला आणि आर्थिक अडचणीमुळे कित्येक तास दवाखान्यात चाचपडत राहिलेल्या आदिवासी समाजातील गरीब कुटुंबाच्या तरुणावर शेवटी उपचार सुरु झाला.त्यातही मदतीचा आकडा कमी होताना दिसताच एकवटलेला त्याचा मित्रपरिवार आताही अनेकांपुढे हात पसरतो आहे.
रामचंद्र उर्फ भुरू कोडापे हा करंजी गावातील मजूर. हातावर आणून पानावर खाण्याइतपत त्याची परिस्थिती. काम मिळाले की कुटुंब जगणार अन्यथा दोन वेळच्या अन्नाची समस्याच.जन्मापासूनच रामचंद्रच्या वाट्याला दारिद्र्य आले. अफाळ मेहनत करूनही परिस्थितीत कुठलाच बदलाव नाही.आदिवासी समाजातील हे दुर्लक्षित कुटुंब.अत्यंत साधी राहणी. इतरांच्या मदतीला धावून जाणारा हा परिवार आज त्याच परिवारातील एकुलत्या लेकरावर ओढावलेल्या संकटकाळात संपूर्ण गाव एकवटला आहे.हर्षल कोडापे हा अवघ्या तेवीस वर्षाचा तरुण. त्याला दोन बहिणी.यापैकी काही वर्षापूर्वीच मोठ्या बहिणीचा विवाह झाला.मात्र सोडचिठ्ठीनंतर वडीलाकडेच राहते.कुटुंबात तीन व्यक्ती असून यांना जगविण्यासाठी बाप बिचारा रात्रंदिवस घाम गाळतो. त्याच्या मदतीला निनावी पायाने फिरणाऱ्या आईचा संघर्ष देखील मन हेलावणारा आहे.लहान मुलगी शिक्षण घेत असल्यामुळे तिच्याकडून या कुटुंबियांच्या मोठ्या अपेक्षा असताना हर्षलची त्याच्या कुटुंबीयांना मिळत असलेली साथ फारच मौल्यवान राहिली. दरम्यान आपल्या या लेकराचा त्याच्या जन्मदिनी अपघात झाला आणि आता जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे.त्याच्या डोक्याला जबर मार असल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया झाली. सुरुवातीला गोंडपिपरी येथील अपघात स्थळापासून चंद्रपूरला हलविण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसे नव्हते.डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव सुरू होता.अचानक घडलेल्या घटनेनंतर या चिंताग्रस्त कुटुंबीयांची उडालेली तारांबळ पाहता शेवटी करंजीकरच त्यांच्या मदतीला धावले. चंद्रपुरातील कोलसिटी हास्पिटलमध्ये हर्षलला उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र तिथे विविध ‘टेस्ट’साठी देखील कुटुंबीयांकडे पैसा नव्हता.हतबल परिवार बिचारा विनवणी करीत होता.त्यावेळी डॉक्टरांनी देखील सामाजिक जाणीवेचा परिचय दिला. दुसरीकडे कुटुंबीयांकडून गावकऱ्यांना मदत मागितल्या जात होती. त्याचवेळी गावातील काही संयम बाळगून राहिलेल्या तरुणांचा बांध फुटला आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुपचा उपयोग करून रात्रभरातच त्यांनी दहा ते पंधरा हजार रुपयाची मदत ऑनलाईन गोळा केली. दुसऱ्याच दिवशी शस्त्रक्रिया राहिल्यामुळे भल्या पहाटेपासूनच गावात हर्षलच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू झाला.दिवस उजाडताच अर्धी रक्कम कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली.एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर संपूर्ण गाव नागरिकांनी पिंजून काढला. ऑनलाइन मदत देखील थांबली नाही. यावेळी केवळ गावातीलच नाहीतर गाव सोडून राहणाऱ्या लोकांचे सुध्दा भूमीपुत्रासाठी हृदय पाझरले.अनेकांची मदत व सहकार्यातून शेवटी शस्त्रक्रिया झाली असली तरी डॉक्टरने सांगितल्यानुसार, पुढील उपचारासाठी अजूनही सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशावेळी समाजातील दानशूर व्यक्ती किंवा सेवाभावी संस्थेनी कोडापे कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन करंजी गावातील नागरिकांनी केले आहे.