गोंदिया : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 13 हजार 655 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
ए. एस. प्रतिनिधी, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या नेतृत्वात जिल्हा न्यायालय, गोंदिया तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये न्यायप्रविष्ठ तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांसह विद्युत, बँक, पाणीपुरवठा, टेलिफोन आणि इतर लोकोपयोगी सेवांशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता.
या लोक अदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेल्या 113 प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून त्यातून 1 कोटी 98 लाख 47 हजार 714 रुपयांची वसुली झाली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ 48 हजार 745 प्रकरणांपैकी 13 हजार 542 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 1 कोटी 71 लाख 30 हजार 891 रुपयांची वसुली झाली. अशा प्रकारे एकूण 53 हजार 307 प्रकरणांपैकी 13 हजार 655 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून एकूण 3 कोटी 69 लाख 78 हजार 605 रुपयांची वसुली करण्यात आली.
स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत ठेवण्यात आलेल्या 112 फौजदारी प्रकरणांपैकी 95 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच 1 हजार 384 पेट्टी प्रकरणांपैकी 893 प्रकरणे निकाली निघाली. महावितरण, पाणी, टेलिफोन आणि बँक रिकव्हरीशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये थकबाकीदारांनी तडजोडीनुसार रक्कम भरल्याने त्यांची प्रकरणे कायमची निकाली काढण्यात आली. त्यामुळे संबंधित विभागांचा तसेच नागरिकांचा मानसिक व आर्थिक ताण कमी झाला.
या लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी विविध न्यायाधीश, जिल्हा वकील संघ, पॅनेलवरील वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पॅरा लीगल व्हॉलंटिअर्स यांनी विशेष सहकार्य केले.









