Home latest News ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये कायदा व करिअर विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये कायदा व करिअर विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार

89

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये कायदा व करिअर विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:-  ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथे “कायदा आणि करिअर” या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी कामगार न्यायालय, रायगड–अलिबाग येथील सन्माननीय न्यायाधीश जी. एस. हांगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी वकिलीच्या क्षेत्रातील ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. वकिली व्यवसायाकडे समाजाचा असलेला दृष्टीकोन यावर भाष्य करताना महिला वकिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. वकिली व्यवसायातील तीन टप्प्यांविषयी मार्गदर्शन करताना पहिल्या टप्प्यात येणारी निराशा बाजूला ठेवून स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर स्वतंत्रपणे वकिली करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कायद्याची निर्मिती इंग्रजी भाषेत झालेली असल्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवावे व त्यासाठी अवांतर वाचन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. विधी शिक्षण घेताना वक्तृत्व, वादविवाद, अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट), संशोधन इत्यादी कौशल्ये आत्मसात करणे तसेच निरीक्षणशक्ती विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

वकिली व्यवसायामध्ये शिस्त, कौशल्य, निश्चय, इच्छाशक्ती व निष्ठा हे गुण अनिवार्य असल्याचे सांगताना त्यांनी नानी पालखीवाला यांच्या वकिली कारकिर्दीचा उदाहरणादाखल उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी स्वतःला एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यासाठी सत्य व सद्गुणांचा नेहमी ध्यास धरावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

या सेमिनाराच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील तसेच लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले. आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. संदिप घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या सेमिनारसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करिअर मार्गदर्शन समितीमार्फत प्रा. सुरज पुरी, प्रा. पियुषा पाटील, प्रा. चिन्मय राणे व प्रा. कौशिक बोडस यांनी सेमिनाराचे आयोजन केले.