*रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर द्यावा :परिवहन मंत्री ॲड. अनिल परब*

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- वाढत्या रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक आहे. रस्त्यावरुन वाहन चालविताना वाहनचालकांना शिस्त लावणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद, नांदेड व लातूर परिवहन विभागाच्या कामाकाजाचा श्री. परब यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त शेखर चन्ने, परिवहन उपायुक्त (प्रशासन) जे.बी. पाटील, परिवहन उपायुक्त (निरीक्षण) दिनकर मनवर, औरंगाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.एस. कामत आदींसह विभागातील सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी श्री. परब यांनी औरंगाबाद, नांदेड व लातूर परिवहन विभागातील महसूल वसुली, वायुवेग पथकाची कामगिरी, सीमा तपासणी नाक्याची कामगिरी, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज, ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहिर केलेले सानुग्रह अनुदान आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
श्री. परब म्हणाले की, शासनाला चांगले उत्पन्न देणारे खाते म्हणून परिवहन विभागाची ओळख आहे. सक्षम अधिकाऱ्यांमुळे दिलेले उदिष्ट वेळेत पूर्णही केल्या जाते. या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी 85 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या, ही निश्चितच कौतुकाचे बाब आहे. यापुढेही लोकांना अधिक सुलभपणे कशा सुविधा दिल्या जातील यावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच हा विभाग अधिक कार्यक्षम करण्यात यावा.
वाढत्या रस्ते अपघाताबद्दल चिंता व्यक्त करताना श्री. परब म्हणाले की, रस्ते अपघातात घट होण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे. अपघात प्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष दयावे. ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहिर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. लोकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळण्यासाठी कामाचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी सुचनाही त्यांनी केली.