सावधान…तुमच्या घरातील ई कचऱ्यापासून आहेत तुम्हाला हे धोके.

54

ई कचऱ्याची गंभीर समस्या…

समस्या ई कचऱ्याची इतकी गंभीर समस्या आ वासून उभी असतानाही आपण ई कचऱ्याविषयी जागृत नाही. काहींना तर ई कचरा म्हणजे काय हे देखील माहीत नाही. ई कचरा म्हणजे तुमच्या आमच्या घरातील निकामी झालेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या सहजपणे आपण इतर कचऱ्यासोबत बाहेर फेकतो. या कचऱ्याच्या निचरा देखील आपण इतर कचऱ्याप्रमाणेच करतो. निकामी झाल्याने फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ई कचरा असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये भरपूर प्रमाणात सजीवांना अपायकारक घटक असतात. हे घटक पर्यावरणातील हवा आणि पाण्यात मिसळले की सभोवतालची हवा, पाणी आणि माती दूषित होती.

मोबाईलच्या किंवा कोणत्याही बॅटरीची निर्मिती शिसे वापरून केली जाते. हे शिसे पावसाच्या पाण्यात झिरपून हवेतील आद्रतेमध्ये मिसळून संबंधित हवा, पाणी आणि माती दूषित करते. अमेरिकेतील एका पर्यावरण संवर्धन संस्थेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी सुमारे तीस दशलक्ष संगणक निकामी झाली म्हणून फेकून दिले जातात. यांपैकी वीस टक्क्यांहुन कमी संगणकाचे पुनर्विनिकरण केली जाते. युरोपमध्ये तर ददरवर्षी सुमारे शंभर दशलक्ष फोन फेकून दिले जातात. कालबाह्य ठरलेली, फेकून दिलेली ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे पर्यावरणातील जागा वेगाने व्यापत आहेत. निष्काळजीपणे फेकलेल्या काही उपकरणांमध्ये बोरिलीयम, कॅडीमीयम, पारा आणि शिसे यासारखी घातक घटक असतात. या घटकांना वातावरणात संमिश्र होण्यास अवकाश लागत असला तरी खूप जास्त प्रमाणात जेंव्हा हे वातावरणात मिसळले जातात तेंव्हा पर्यावरणाची मोठी हानी होते. एकूणच ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे हे लक्षात घेता ई कचऱ्याच्या समस्यावर वेळीच आणि गांभीर्याने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.

ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे. त्याचा निचरा इतर कचऱ्यासोबत न करता त्याचा निचरा करण्यासाठी भिन्न प्रक्रिया राबवली पाहिजे. ई कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत या कचऱ्याचे संकलन, त्याचे रिसायकलिंग आणि त्याचे री – मॅन्युफॅक्चरिंग महत्वाचे आहे त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने संयुक्त रुपात पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. पर्यावरण मंत्रालयाद्वारे सादर केलक्या ई कचरा व्यवस्थापन नियम २०२२ च्या मसुद्यात ई कचरा व्यवस्थापनामध्ये उत्पादक, पुनर्वापर संस्था आणि संघटना सर्वांची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. ती जबाबदारी प्रत्येक घटकाने पार पाडल्यास काही प्रमाणात ही समस्या मिटेल.

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५