ठोस उपाययोजना न केल्यामुळे चंद्रपूर वीज केंद्रातील प्रदूषण गंभीर
♦️ आमदार सुधाकर अडबाले यांचा आरोप
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 12 मार्च
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या रोपवे प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा साठवला जातो, जो रोपवेच्या माध्यमातून महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवला जातो. मात्र, या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि प्रदूषण पसरत आहे. यामुळे ऊर्जानगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आरोप आमदार सुधाकर अडबाले यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.
अडबाले म्हणाले, महाऔष्णिक वीज केंद्रात वापरला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे, ज्यामुळे संचांमधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेत पसरते. यामुळे 10 किलोमीटरपर्यंत प्रदूषण पसरत असून, नागरिकांच्या घरांमध्येही राख साचत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. काही दिवसांपूर्वी महाऔष्णिक वीज केंद्राने इरई नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने जलप्रदूषण झाले. परिणामी, चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आणि हजारो नागरिकांना स्वच्छ पाणी मिळवण्यात अडचणी आल्या. प्रशासन वारंवार होणार्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करीत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, असे आ. अडबाले म्हणाले.
त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 8 क्रमांक संचाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून, इलेक्ट्रो स्टॅटिक प्रिसिपेटटरचे परीक्षण केले जाईल. याशिवाय, नऊचा संच बंद आहे. संबंधित दुरुस्त्या केल्यानंतर संच सुरू करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या बाबींबाबत बदल होईल. चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठित केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
====================
