डोंबिवली होणार प्रदूषण मुक्त, १५६ धोकादायक कारखान्यांचे होणार स्थलांतर

54
डोंबिवली होणार प्रदूषण मुक्त, १५६ धोकादायक कारखान्यांचे होणार स्थलांतर

मीडिया वार्ता न्युज
३ फेब्रुवारी, मुंबई: डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली .

उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार 156 कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत.

डोंबिवली होणार प्रदूषण मुक्त

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये 525 औद्योगिक भूखंड आहेत. तर 617 निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून 50 मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याच्या धोकादायक कारखान्यांना उत्पादनात बदल करून व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. डोंबिवलीतील कारखान्यांना पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रचलित दराने भूखंड उपलब्ध करून दिले जातील. कारखाने स्थलांतरित होत असताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय़ संबंधित विभाग घेतील.

हे आपण वाचलंत का?

 

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार.
विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून प्राधान्यांने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने अलिकडेच घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचे श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.