मीडिया वार्ता न्यूज़

मुंबई -देशभरातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिय इंटेलिजन्स) हा नवा पर्याय पुढे येत आहेत. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अभ्यासासाठीचे भारतातील पहिले केंद्र मुंबईत आकारास येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना केंद्रात कम्प्युटर सायन्स विभागाच्या वतीने हे केंद्र उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या रविवारी, १८ फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. राज्य सरकार, मुंबई विद्यापीठ आणि वाधवानी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र उभारले जाणार आहे.

  देशभरातील सामान्य जनतेसमोर असलेले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तंत्रज्ञानाने थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करून ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापराचे प्रमाणही वाढत आहे. जगभरात विविध ठिकाणी यासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली आहेत. देशातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या पर्यायाचा विचार करण्याची सूचना काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. याच धर्तीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भारतातील पहिले केंद्र मुंबईत आकारास येत आहे. ‘वाधवानी इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ सोशल गुड्स’ असे या केंद्राचे नाव आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे हे केंद्र उभारले जात आहे. मुंबई विद्यापीठ, राज्य सरकार आणि वाधवानी इन्स्टिट्यूट या तिघांच्या सहकार्यातून केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. वाधवानी इन्स्टिट्यूटकडून तांत्रिक बाजू सांभाळण्यात येत असल्याचे कळते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आवश्यक असलेला सर्व डाटा हा राज्य सरकारकडून पुरविला जाणार आहे. या केंद्रात देशातील सामान्य नागरिकांच्या शैक्षणिक, आरोग्य आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तांत्रिक पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना याठिकाणी संशोधनासाठी आमंत्रित केले जाणार असून येत्या काळात या विषयावरील अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here